२ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी
नवी मुंबई ।तुर्भे डम्पिंग ग्राउंड येथे प्रस्तावित असलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाविरोधात तुर्भे गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या आणि हिताच्या दृष्टीने हा प्रकल्प अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा किंवा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
तुर्भे डम्पिंग ग्राउंड परिसरात प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर संभाव्य परिणाम होण्याची चिंता याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरी वस्तीपासून दूर पर्यायी ठिकाणी हा प्रकल्प स्थलांतरित करावा, अथवा नागरिकांच्या हिताचा विचार करून तो रद्द करावा, अशी भूमिका याचिकाकर्त्याने घेतली आहे.या प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा तसेच भविष्यातील परिणामांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे तुर्भे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.तुर्भे डम्पिंग ग्राउंड आणि प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रश्नावर स्थानिक पातळीवरही विरोध सुरू असून, नागरिकांच्या हितासाठी प्रकल्प अन्यत्र हलविण्याची किंवा रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.
